नीलकांत ढोले

जन्म - १५ जानेवारी १९३९
पत्ता - ट्रक्टर फैंक्टरी चौक
साई नगर, हिंगणा रोड नागपूर १६
संपर्क - ९६७९१५०६२४

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

बुधवार, ३ डिसेंबर, २०१४

ज्येष्ठ साहित्यिकांच्या शब्दात...

कवी नीलकांत ढोले यांची कविता गेली पस्तीस वर्षे मराठी साहित्यात चांगलीच स्थिरावली आहे. ती मुळातच लाघवी आहे. आपल्या निसर्गसिद्ध लाघवाने ती सहृदय वाचकांचे मन लीलया वश करते. कुणाच्याही वकीलीशिवाय ही कविता छंद सुंदर आहे. तिला लयीचे वळण असून छंदमयतेचा लळा आहे. छंदशास्त्राच्या अनुशासनात राहणे तिला बंधनकारक वाटत नसून भुषणावह वाटते. म्हणूनच ती रसिकांच्या मनात रूणझुणत राहते. कारण कवीच्या अनुभवाला व आशयालाहि लय आहे. तीच लय अभिव्यक्‍तीच्या
वेळी छंदाची बोटे हाती धरून आपल्या तंद्रीत विहरत जाते. कवितेतील अनुभवांचेहि विभ्रम अतिशय मोहक आहेत. अंतःकरणात प्रियतमेचे रूप गोंदवून ठेवताना दारावरचा मंद झुलणारा ऋतूंचा जिव्हाळा, सभोवती कळयांच्या चिता पेटल्या असताना मनातील विझू पाहणारे निखारे, काजळकाळया नयनकडांवर स्वप्नांचे लवथवणारे झुंबर, गंधवतीला जडलेली नवरंगाची चंदनबाधा, ऋतूरंग घेउन येणारी अलबेली सांज, वडाचा सन्यस्त पार, आसवे शिंपून फुलवलेली बागशाही, यासारख्या मोरपंखी प्रतिमांमधून कविचे अनुभव रसिक मनात अलगद ठिबकत जातात. कवीला निसर्गाचे अलवार सौंदर्य प्रेमभावनेची हळूवार अभिरूची व कलंदर जीवनरीतीची आवड आहे. त्याचबरोबर सामाजिक अन्यायाबद्दलची चीडहि आहे व ती तुटून पडणाऱ्या प्रखर शब्दात प्रकटहि होते.

-राम शेवाळकर
नागपूर
शके 1923, रथसप्तमी
*************************************************************

कविवर्य श्री.नीलकांत ढोले यांचेशी माझा गेल्या तीस वर्षापासून संबंध आहे. आमची खरी ओळख त्यांच्या मला अत्यंत प्रभावित करणा-या एका मराठी गझलेमुळेच झाली. ती गझल मला अक्षरशः चढली. अनेक ठिकाणी मी स्वतः त्यांची सदरहू गझल माझया चालीत सादर केली.
वानगीदाखल तिचे काही शेर पहा...
मी हिशेब करता करता थंडगार झालो
आपुल्याच आयुष्याचा कर्जदार झालो !

कोवळया पिलांचा चारा शोधण्यास जाता
बेइमान दारापुढती अर्जदार झालो !

किती चुका झाल्या गेल्या तमा काय त्याची?
आपुल्याच अपराधाचा साक्षीदार झालो !
वरील शेर श्री.नीलकांत ढोले हे जातिवंत कलदार कवी आहे, हया वास्तवाचा बोलका पुरावा नाहीत काय?
मी हे सांगीतलेच पाहिजे की प्रस्तुत "कळा काळजाच्या' हया काव्यसंग्रहातील सर्वच गझला गझलेच्या शरीरशास्त्रानुसार आहेत असेही नाही. पण कविवर्य श्री नीलकांत ढोले यांचे जीवन आणि परिस्थितीने त्यांच्यावर घातलेल्या मर्यादा लक्षात घेता हे घडणे अटळ होते. पण "यार जिंदा तो सोहबत बाकी' कविवर्याचे ह्रदय "यार' आहे. तेव्हा कवितेची /गझलेची सोबत सुटणार नाही !
पण तंत्र महत्वाचे की "मंत्र'महत्वाचा! माझया मते कविवर्य श्री.निलकांत ढोले हयांना मंत्र गवसला आहे. फक्‍त त्या मंत्राची "सिद्‌धी' व्हायची आहे. अर्थात साधनेशिवाय सिद्‌धी नाही. कविवर्यांनी साधना सोडू नये.त्यांना भरपूर आयुष्य लाभो. धैर्य सोडू नये. निदान ते माझया वयाचे व माझयासारखे थकलेले नाहीत. ते गझलेचा/कवितेचा डाव जिंकणारच जिंकणार... स्वतःवर विश्‍वास ठेवावा.ते जिंकतील. मी त्यांना त्यांच्याच शब्दात विचारतो...
हे वेड कोठुनी आले? जगाच्या इतिहासात ज्यांनी मानवीजीवन अधिक सुंदर करण्यासाठी लढा दिला. मानवी जीवनातील विकृती नष्ट करण्यासाठी उठाव केले, त्यांना त्यांनी लौकिक दृष्टीने "वेडे 'म्हणता येईल. पण कविता म्हणजे केवळ सौंदर्यपुजन नव्हे.!कविता म्हणजे मानवी जीवनावर स्वार्थी शोषकांनी लादलेल्या कुरूपतेवरील प्रहार होय. हा प्रहार करण्यासाठी सत्य व न्यायाचा आधार हवाय, असेही म्हणता येईल की कविता म्हणजे न्याच्या म्यानातून उपसलेली सत्याची तलवार !
मग तो न्याय व्यक्‍तिगत असो किंवा सामाजिक.! कविवर्य श्री नीलकांत ढोले हे स्वतः प्रसिद्‌धीपराडःमुख वृत्तीचे असले तरी माझया लेखी ते एक यशस्वी कवी आहेत. कारण त्यांना "कवीचे काळीज' लाभलेले आहे. शब्दांना पॉलिश नसले म्हणून काय झाले?
काटेरी फांदीवरती
काळीज टांगले त्याने
रक्‍ताच्या थेंबामधुनी
गुणगुणली त्याची गाने !
मी कविवर्य श्री. ढोले हयांयाविषयी मला ते व जेवढे लिहायचे होते, ते सर्व लिहू शकलो नाही. हयाबद्‌दल वाचकांनी कृपया मला क्षमा करावी. कविवर्याच्याच शब्दात सांगायचे झाले तर...
जे इथे घेउन आलो, द्यायचे राहून गेले. !
काय जे होते मनी ते व्हायचे राहून गेले !!
-
सुरेश भट
शनिवार, 18 ऑगष्ट2001
*************************************************************

कवी नीलकांत ढोले यांचा हा दुसरा काव्यसंग्रह. कवी कविता का लिहितो?कविता, विशेषतः भावकविता-हा कवीचा आत्मविष्कारातून अर्थसमृद्‌धी साधते. तेव्हाच त्या अविष्काराला निर्मीतीचा स्पर्श होतो. कवी नीलकांत ढोले यांनी प्रासंगिक,सामाजिक आणि व्यक्‍तिगौरवपर कविता लिहिल्या आहेत...गझलही; त्या अनेक रसिकांना आवडतील; मला स्वतःला मात्र त्यांच्या निसर्ग प्रतिमांतून व्यक्‍त होणा-या "हा आसमंत सारा'; "अंधार निथळतो भवती', "श्रावणशिरवा आला', "पसरून सारे पंख,' "हा गाव कुणाचा आहे?' "तुला शोधताना' आदी कविता वेधक वाटतात. त्यांच्यातील गतिसूचक प्रतिमा विलोभनीय आहेत. विविधतेच्या हव्यासापेक्षा आत्मबळाचा साक्षात्कार मोलाचा असतो हे इथे त्यांच्या लक्षात येते.
-द.भि.कुलकर्णी
साहित्य वाचस्पती
ए.1जंतरमंतर
अमरावती मार्ग
नागपूर440010
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
हा आसमंत सारा ...................
हा आसमंत सारा बेभान धुंद आहे...
इथल्या कळया फुलांच्या विळख्यात चंद्र आहे !!

होउनी दूत येती आषाढ मेघ सारे
देहात रोमरोमी भिजतो अनंग आहे !!

गुलमोहरासवे मी करिता वसंतपुजा
डोळयात या घडीला आरक्‍त रंग आहे !!

भक्‍तीत ओढ माझी मी भाव नम्र भोळा
ओवीस साथ द्याया वेडा अभंग आहे !!

एका खुळया कळीचा आहे लळा जिवाला
बेचैन काळजाचा ठेका बुलंद आहे !!

वाहे तुडूंब भरूनी इंद्रायणी सुखाची
झंकारताच वीणा हसतो मृदंग आहे !!

-नीलकांत ढोले
साईनगर, ट्रॅक्‍टर कंपनी चौक
हिंगणा मार्ग
नागपूर
............................... ............................... ............................... ...............................
हे वेड कोठुनी आले? 
                                         
हे वेड कोठुनी आले?रक्‍तात मिसळुनी गेले 
फुलवून कळयांना माझया, काळीज उसवुनी गेले !! 

रानातिल घेउन वारा घुटमळले दारापुढती 
तुडवून सुखाच्या राशी, दुःखात हरवुनी गेले !! 

येताना ओंजळ त्याची अश्रूंनी भिजली होती 
मधुगंध फुलांचे झेले, प्राणांत उधळुली गेले !! 

बाहूत कोवळया त्याने सूर्यास कवळिले होते 
उद्‌दाम रसाच्या पेशी रक्‍तात घुसळुनी केले !! 

अंधार असा घनभारी डोहात उतरला जेव्हा 
चैतन्य कुळीच्या ज्योती देहात उजळुनी गेले !! 

कारूण्य निथळले त्याच्या ओलेत्या डोळयांमधुनी 
मुक्‍तीचे छंद दिवाणो विश्‍वात रूजवुनी गेले !! 
-नीलकांत ढोले 
साईनगर, ट्रॅक्‍टर कंपनी चौक 
हिंगणा मार्ग नागपूर 16 
............................. ............................. ............................. ............................. .............................
वळणासवे जगाच्या                                  
वळणासवे जगाच्या वळता कधी न आले
मज पीठ आंधळयाचे दळता कधी न आले !!

धारांत चिंब झालो, फुललो फुलासवे मी
वृक्षासवे परंतू, फळता कधी न आले !!

वा-यासवे तुफानी कैफात धावलो मी
कळपात कोकरांच्या पळता कधी न आले !!

झाले किती इशारे बदनाम मोसमांचे
या नेक पावलांना ढळता कधी न आले !!
मी पोळलो कधीचा वणव्यात वेदनांच्या
सरणावरती सुखाच्या जळता कधी न आले !!
नीलकांत ढोले
साईनगर हिंगणा मार्ग
नागपूर 16
............................. ............................. ............................. ............................. .............................
                                  घेउनी ओझे उराशी.. 
घेउन ओझे उराशी, येथे जगावे लागते 
श्‍वास घेतो जीवनाचा ऐसे म्हणावे लागते !! 

रात्रंदिनी पाठीवरी या झेलुनी आसूड ओले 
सोसुनी सारे मुक्‍याने येथे रडावे लागते !! 
अंतरीच्या वेदना या कळतील कां सांगा कुणा? 
हुंदके दाबुनी ओठी येथे हसावे लागते !! 
गाडुनी ममताच सगळी भरण्यास ही खळगी इथे 
फाटक्‍यांना पोर हाती येथे धरावे लागते !! 

छातीवरी ठेवूनन धोंडा समजावितो वेडया मना 
जगतो असा की सारखे येथे मरावे लागते !! 
नीलकांत ढोले 
साईनगर ट्रॅक्‍टर कंपनी चौक 
हिंगणा रोड 
नागपूर 
..........................
  पहारे फुलांचे                                     
पहारे फुलांचे मी फसवू कितीदा?
इशारे तुझे सांग चुकवू कितीदा?

कळयांच्या चिता पेटल्या या सभोती
निखारे मनी सांग विझवू कितीदा?

किती धुंद आले रूतू वांझ गेले
फुलोरे असे सांग फुलवू कितीदा?

तुझे रूप या अंतरी गोंदताना
शहारे मनी सांग लपवू कितीदा?

थिटे पात्र माझे तुझी दान वर्षा
किनारे कसे सांग उसवू कितीदा?
नीलकांत ढोले
...................................
                                  झाली जिवंत प्रेते...                       

................... 
झाली जिवंत प्रेत उठणार आज आहे ! 
जळती मशाल सारे धरणार हात आहे !! 

चुकला हिशेब मागे पुसतील या घडीला 
घनघोर कत्तलींची ठरणार रात आहे !! 

हे आवळा खुशाल गळफास टाकलेले 
जल्लाद मात्र तुमचा करणार घात आहे !! 

झाले स्मशान जागे थैमान हो भुतांचे 
कंगाल कंदिलांची विझणार वात आहे !! 

निर्भिड या समोर अश्राप कोकरांनो 
बेमान लांडग्यांची पळणार जात आहे !! 

यारे!नव्या युगाची उभवा वरी पताका 
सामर्थ्य सूर्य सगळे करणार साथ आहे !! 

आता परंपरेचा इतिहास संपलेला 
जुलूमास सोसणारी गळणार कात आहे !! 

-नीलकांत ढोले

--------------------------------------

                 सोहळे स्वातंत्रयाचे..              
सोहळेच स्वातंत्रयाचे आम्हाला मंजूर नाही 
या उदास वैफल्याची का उगा फिरविता द्वाही ! 

हे खडे तमाशे तुमचे जनतेच्या कल्याणाचे 
काढता कशाला फतवे?देशाच्या उद्‌धाराचे 
बेचिराग घरटयामधल्या पक्ष्यांना चारा नाही ! 

का न्याय रडे एकांती? अन्यास नाचतो नंगा 
स्वार्थांध झुंडशाहीचा बेबंद माजला दंगा 
दरबार कंसकर्माचे हे भरले ठायी ठायी !! 

ही कुपोषणाने मरती निष्पाप कुणाची पोरे? 
कुरणात मस्त मलईच्या बेलगाम चरती ढोरे 
का पुचाट समृद्‌धीची ही फुकाच देता ग्वाही? 

चालती कृपेने तुमच्या डघडयावर क ाळे धंदे 
उकळती अघोरी चंदा तुमचेच कुणी बाशिंदे 
काढता खुल्या बाजारी विक्रीस आपुली आई !! 

देवकी झुरे अंधारी, गोकुळात विरला पान्हा 
वेणूवर धमधमणा-या त्या कुठे हरवल्या ताना? 
हे गोप गोपिका सगळे गातात कुणा अंगाई? 
नीलकांत ढोले 
.....................
                                 सुरेश भट                              
तू कधी अंगार झाला, कोयत्याची धार झाला !
गांजलेल्या सोबत्यांची तडपती तलवार झाला !!

रंगलेला तू कलंदर, चंद्रयात्रेचा प्रवासी
रूपगंधेच्या महाली मलमली श्रृंगार झाला !

भाव तू भोळया तुक्‍याचा, भक्‍तीरसाची साय तू
पंढरीच्या पायरीला सावळा जोहार झाला !!

चुड हाती घेतली तू जाळण्याला दंभ सारा
झुंजण्या जुलुमासवे तू विक्रमी झुंजार झाला !!

घोर झंझावात आला, दाही दिशांनी येथल्या
चेतवाया काजव्यांना यार, तू एल्गार झाला !!

तू प्रतापी गर्जणारा शब्दशाहीला शिकंदर
मायबोलीच्या प्रदेशी थोर तू मंदार झाला !!
नीलकांत ढोले
.........................
   मी हिशेब करता करता...                           
मी हिशेब करता करता थंडगार झालो 
आपुल्याच आयुुष्याचा कर्जदार झालो !! 

जोडण्यास गेलो नाती कोवळया कळयांशी 
आणि हाय !त्यांच्यासाठी गुन्हेगार झालो !! 

पुण्य ज्यास म्हणती सारे गाठण्यास जाता 
हाय !हाय! पापाचा मी भागीदार झालो !! 

कोवळया पिलांचा चारा शोधण्यास जाता 
बेइमान दारापुढती अर्जदार झालो !! 

जिथे तिथे दगडापुढती मान झुकवितांना 
पोटच्याच गोळयासाठी धारदार झालो !! 

किती चुका झाल्या गेल्या तमा काय त्याची? 
आपुल्याच अपराधाचा साक्षीदार झालो !! 
नीलकांत ढोले 

........................................................

          जे सोबती सुखाचे.       .
जे सोबती सुखाचे ते धारदार झाले ! 
चवताल काफिरांचे पाठीत वार झाले !! 

आला वसंत रानी, हरखून जीव गेला 
बेमान मोसमांचे उलटे करार झाले !! 

सत्तासनात ज्यांची होती मिरासदारी 
खायास काळ आता धरणीस भार झाले !! 

बाजार मंद झाला तेजीत चालणारा 
सगळेच रोख सौंदे आता उधार झाले !! 

गर्दी पिसाट झाली चौकात गारद्यांच्या 
येथील रामशास्त्री आता फरार झाले !! 

बडव्यास घेउनीया दिंडी इथे निघाली 
राउळ पंढरीचे ओसाड पार झाले !! 
नीलकांत ढोले 
..............
                          अर्थ आता जीवनाचा....            
अर्थ आता जीवनाचा मज कळाया लागला
कोपरा या काळजाचा कां जळाया लागला !!

सांज येता सावळी ही कोंदल्या दाही दिशा
चालताना तोल माझा कां ढळाया लागला ?

येथल्या हळव्या दिव्यांची स्पंदने मंदावली
सारखा हा श्‍वास माझा का छळाया लागला?

सोबतीला गाव होता दूर मागे राहिला
ओळखीचा भेटणारा कां टळाया लागला !!

शिंपुनिया आसवांनी फुलविली ही बागशाही
बहर हा एैसा अवेळी कां गळाया लागला ?
नीलकांत ढोले
.............................
चांदण्यांची ही नशा...                                                    
चांदण्यांची ही नशा कां कधी कळणार आहे? 
ये सखे ! बिलगून जाउ, रात्र ही टळणार आहे !! 

चंदणी गंधात न्हालो, ही तुझी लावण्यवेली 
साजनी पाहून तुजला चंद्रमा जळणार आहे ! 

ती पहा आकाशगंगा तुज सखी आमंत्रिते 
स्वप्न हिंदोळयावरी गे ! तू किती झुलणार आहे ? 

बहाणे सोडुनी सारे मनीचा जाउ दे रूसवा 
भाबडया माझया जिवाला, काय तू छळणार आहे ? 

रम्य या कोजागिरीच्या सोहळयाला झिंग आली 
सांग राणी एकटी तू कां अशी झुरणार आहे? 
नीलकांत ढोले
---------------------

                     भट्‌टीत पोळलेले              
भट्‌टीत पोळलेले ते कामगार होते 
हातात गुच्छ ज्यांच्या ते नामदार होते ! 

झाली उगीच चर्चा वेडया समर्पणाची 
खुर्चीत पेंगणारे ते खासदार होते !! 

चौकी असून जागी लंपास माल झाला 
यादीत चोरटयांच्या ते जामदार होते !! 

जे मालदार होते ते जेवले तुपाशी 
जे राहिले उपाशी ते सालदार होते !! 

पंक्‍तीत वाढलेला चोथा खमंग होता (?) 
जलसे कसे तयांचे ते शानदार होते !! 

या कत्तलीत आली ही मेंढरे खुशीने 
हातातले सुरेही ते छानदार होते !! 

............................. ............................. ............................. .............................
मी विचार केला नाही !
वेलीवर फुलण्याआधी मी विचार केला नाही
सरणावर जळण्याआधी मी विचार केला नाही !

काटेरी तुडवित वाटा, मी असाच बहरत होतो
वळणावर वळण्याआधी मी विचार केला नाही !!


मज कधीच नाही कळले मी कुठून उगवत होतो
माथ्यावर ढळण्याआधी मी विचार केला नाही !!

काळीज असे का उलते , का भरून येती डोळे?
पाण्यावर झरण्याआधी मी विचार केला नाही !!

हे जाते आयुष्याचे रेटीत जन्मली ओवी
गाण्यावर दळण्याआधी मी विचार केला नाही !!

बेलगाम केव्हा झालो तोडून बंधने सारी ?
वा-यावर पळण्याआधी मी विचार केला नाही !!

मी हलाल पुरता झालो ,शब्दांच्या नादापायी
कवितेवर मरण्याआधी मी विचार केला नाही !!
..................... ..................... ..................... ..................... .....................
थोडे जगून घेतो... 
आहे श्‍वास काही थोडे जगून घेतो ! 
हे रंग जीवनाचे थोडे बघून घेतो !! 

थाबंला मी पायरीला ते सर्व ताठ होते 
त्यांचे सलाम आता थोडे झुकून घेतो !! 

झाले किती रिकामे ते मद्यधुंद प्याले 
उरलेत घोट काही थोडे जपून घेतो !! 

हे भोग भोगण्याचे झाले करार होते 
येता भरून डोळे थोडे पुसून घेतो !! 

का उन्ह सावल्यांचा हा खेळ चाललेला 
ओझे उरावरी हे थोडे हसून घेतो !! 

.....................
बोलून फार झाल
बोलून फार झाले , तोलून फार झाले !
काळीत हे बिचारे , सोलून फार झाले !!

चर्चा उगाच कां त्या घनघोर कत्तलीची
हे वार सोबत्यांचे झेलून फार झाले !!

सांगू नका कहाणी वेडया समर्पणाची
जखमेवरी मिठाला चोळून फार झाले !!

शिंपून कोण गेले आता गुलाब पाणी ?
माझया खुळया जिवाला जाळून फार झाले !!

शब्दांत साखरेची ही पेरणी कशाला?
दावे जुने पुराणे घोळून फार झाले !!
......................... ......................... ......................... ......................... ......................... .........................
काय बोलावे? 
कुणाशी काय बोलावे? मनाशी फार बोलावे 
जनाशी बोलता काही खरे कलदार बोलावे ! 

मनीच्या व्यर्थ या चिंता कुणाला काय सांगाव्या? 
मुळी ना टाळता आले जरा हळूवार बोलावे ! 

कशाला पाखडा फोले कधी जाता सभेमाजी 
कळावे सर्व श्रोत्यांना निके दळदार बोलावे ! 

फुलांचा रेशमी विळखा कधी पडता गळयाभोवती 
हळू गोंजारूनी त्यांना कसे गुलजार बोलावे ! 

स्वतःला खूप जोखावे जगाच्या चोख बाजारी 
भराया पोतही अपुली भले कळदार बोलावे !! 

रसाच्या वर्षती धारा रसील्या मैफलीमाजी 
रसज्ञा तोषवी ते जे असे रसदार बोलावे ! 

खुळयाशी काय बोलावे? खळाशी ताठ बोलावे 
दिलाच्या दिलवरापाशी खुले दिलदार बोलावे !! 
...................... 
माणसांनी माणसांचा 
माणसांनी माणसांचा मांडला बाजार आहे ! 
माणसांच्या विकृतीचा हा जुना आजार आहे !! 

शेज येथे कंटकांना कोवळया ताज्या फुलांची ! 
चंदनाला कालियाचा लाभला शेजार आहे !! 

कसा भोग वनवासाचा पुण्यवंतांच्या कपाळी 
पाप येथे भाग्यशाली वासना गुलजार आहे !! 

नाच नग्न अन्यायाचा बेधुंद रंगलेला 
इथे न्याय शिरजोरांच्या हातचे औजार आहे !! 

मत्त झाल्या मेघमाला आभाळही बेभान सारे 
चंद्रमा बंदिस्त येथे चांदणे बेजार आहे !!